Thursday, April 21, 2011

जैतापूर प्रकल्प... नाही म्हणजे नाहीच!

* महासभेत उद्धव ठाकरे यांचा निर्धार


* काँग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघाती टीका

टीम मटा

' कोणत्याही परिस्थितीत शिवसेना जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही. शिवसेना कोकणवासीयांच्या पाठीशी आहे. हा जनसमुदायच आमची शक्ती आहे. या शक्तीच्या जोरावरच आम्ही कोकणावरचे अणुसंकट परतवून लावू...' असा इशारा देत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथील विराट सभेत जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले.

बहुचर्चित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची महासभा शनिवारी मीठगवाणे येथे आयोजित करण्यात आली होती. या महासभेला कोकणातील शिवसेनेचे सर्वच आमदार-खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सुमारे २५ हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम समाजाची उपस्थितीही लक्षणीय होती. सकाळपासूनच मीठगवाणेकडे येणाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर दुतर्फा गर्दी जमली होती. सकाळी ११ वाजता उद्धव ठाकरे यांचे आगमन अपेक्षित होते. मात्र, १० वाजताच उद्धव यांचे हेलिकॉप्टरने मीठगवाणे गावात आगमन झाले. परशुराम उपरकर व राजन साळवी यांनी हापूस आंब्याचा हार घालून उद्धव यांचे व्यासपीठावर स्वागत केले. उद्धव भाषणासाठी उठताच 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयजयकाराने परिसर दुमदुमला. राज्य व केंदात सत्तेवर असलेल्या काँग्रेसवर टीकेची झोड उठवत उद्धव यांनी भाषणाला सुरुवात केली.

' आम्हाला राज्यात दंगाधोपा करायचा नाही. मात्र, आमच्या सहनशीलतेचा अंत झाल्यास त्यापुढची जबाबदारी काँग्रेसची राहील. जुलूम-जबरदस्तीने प्रकल्प जैतापूरवासीयांवर लादू नका. अन्यथा परत येईन त्यावेळी तमाम महाराष्ट्र गोळा केल्याशिवाय राहणार नाही' अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारला ठणकावले.

उपमुख्यमंत्री अजित पवार व रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांना सज्जड इशारा देताना, अणुऊर्जा प्रकल्प जैतापुरात होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रकल्पाला एकवटून विरोध करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित जनसमुदायाकडून घेतले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनाही त्यांनी भाषणात टोले हाणले. माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनीही नारायण राणेंवर खरपूस टीका केली.

यावेळी लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी, आमदार दत्ताजी नलावडे, आमदार सुभाष देसाई, रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राजेंद महाडिक, नीलम गोऱ्हे, जि. प. अध्यक्षा रचना महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी संपादित केलेल्या 'जपान ते जैतापूर' या पुस्तिकेचेही प्रकाशन यावेळी झाले.

No comments:

Post a Comment